संघाचे मुस्लिमकेंद्रित हिंदुत्व आणि आंबेडकरांच्या भगवीकरणाची चिकित्सा



 


 


संघाचे मुस्लिमकेंद्रित हिंदुत्व आणि आंबेडकरांच्या भगवीकरणाची चिकित्सा 


देशात अस्तित्वात असलेला  संघपरिवार बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय, महापरिनिर्वाण दिवसाला आंबेडकरी विचाराचा जागर करत असल्याचं भासवतोय पण आंबेडकरी चळवळीला लोकांना तुम्हांला मला याबद्दल काहीच वाटत नाही.वस्तुस्थिती पाहता ही फार भयानक गोष्ट आहे. कारण कोणत्याही महामानवाचे अस्तित्व हे त्यांच्या अनुयायांमध्ये असणार्या वैचारिक स्पष्टतेवर अवलंबुन असते. संघपरिवाराकडे डोळेझाक करून आपण ही गोष्ट सिद्ध करून देत आहोत. आज बाबासाहेबांना हिंदुधार्जिणे दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मुस्लिमविरोधी दाखवण्याचा प्रयत्न होतोय. 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि मनु ही दोन वेगवेगळी टोक. मनुवाद हा विषमतेचा विचार मांडणारा , चातुर्वर्ण्याच्या आधारावर जातींची रचना करून तोच खरा सुदृढ समाज अशी मानवी समाजाची कल्पना करणारा तर, बाबासाहेबांचा वैचारिक विरोध हिंदु धर्मातील चार्तुर्वर्ण्याला , जातव्यवस्थेतील विषमतेला, अस्पृश्यतेला . ही दोन्ही टोकं समरसतेच्या नावाखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न 1980 च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने झाला .थोडक्यात हा प्रयत्न म्हणजे आंबेडकरांचे हिंदुकरण होय. याला मी आंबेडकरांचे भगवीकरण असेही म्हणेन. आता संघाला आंबेडकरांचे हिंदुकरण करण्याची गरज का पडली ? याची कारण शोधल्यानंतर आपणांस याचा उलगडा होउ शकतो . याच प्रमुख कारण हे आहे की , डाँ. आंबेडकर हे दलित समाजाची बनलेली व वाढत जाणारी अस्मिता आणि दुसरे म्हणजे आंबेडकरानी सैद्धांतिक पातळीवर हिंदु धर्माला केलेला ठोस विरोध होय. कारण समजुन घेत असताना संघाच्या हिंदुत्वाची संकल्पना काय आहे ? हे ही पहावे लागेल . संघाचे हिंदुत्व हे सतत भारतीय मुस्लिम आणि मुस्लिम अवकाशा भोवतीच घुटमळत राहिलेले आपणांस दिसते. त्याचबरोबर भारताला हिंदुराष्ट्र संबोधत भगव्या प्रतिकांची मांडणी करून अस्मितांचे राजकारण ही सुद्धा संघाच्या हिंदुत्वाची दुसरी बाजु आहे. अशाप्रकारे या उदिष्टांना पोषक व साधर्म्य साधणार्या गोष्टीचं उदात्तीकरण व प्रचार प्रसार हा संघाचा नेहमीचा कार्यक्रम राहिलेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत डाँ. आंबेडकरांची हिंदुकरणाची प्रक्रिया त्यांनी राबवली. याचे अगदी तपशालवार विवेचन पुराव्यासहित सुहास पळशीकर यांच्या " चिकित्सा : डॉ आंबेडकरांच्या हिंदुकरणाची "या पुस्तकात  पहायला मिळते. पुस्तकातील आशयाचा थोडक्यात आढावा घेत असताना आपल्या प्रिय नेत्याची किंवा समाजातील वस्तुस्थितीची समीक्षा कठोरपणाने करण्यास सिद्ध व्हावे लागेल.ही दृष्टी हे पुस्तक प्रत्येक वाचकास बहाल करते.जसे की आंबेडकरांच्या हिंदुत्वाची कल्पना 80 च्या दशकात आकार घेवु लागली होती आणि आंबेडकरांचे विचार व हिंदुधर्माचे विचार यामध्ये अनेक  पातळ्यावर कसे साधर्म्य आहे . हे ओढुन ताणुन का होइना दाखविण्याचे प्रयत्न संघपरिवाराकडुन जोमाने सुरू झाले. याची सुरूवात सन 1991 सालच्या डॉ. आंबेडकरांच्या जन्मशताब्दी निमित्ताने " विचारयात्रा" नावाचा विशेषांक प्रकाशित केला.ज्याचे उपशीर्षक ' डॉ हेडगेवार ते डॉ. आंबेडकर : एक सामाजिक प्रवास ' असे होते. याला सुहास पळशीकर ' आंबेडकरांचे अपहरण असे म्हणतात.यानंतर सामाजिक समरसता मंचाचे काम वेगात सुरू झाले. तेव्हापासुन अगदी आजतागायत अ.भा.वि.प. , समरसता मंच इ संघटना 14 एप्रिल , 6 डिसे. या दिवशी आंबेडकर केंद्रित कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करू लागल्या.व आता गोळवलकर व आंबेडकर जर एका मंचावर आणायचे असतील तर त्यांच्या विचारातील साम्यस्थळे शोधणे अपरिहार्य होते.हिंदुधर्म हा संघपरिवाराचा श्वास तर हिंदु धर्माचा विरोध ही आंबेडकरांची मुलगामी भुमिका . या दोन्हींची आपल्या सोयीनी सांगड घालण्याचे प्रयत्न संघपरिवाराने विचारपुर्वक सुरू केले. यात त्यांना बर्यापैकी यश आलेल दिसतय. आंबेडकरांनी हिंदु धर्माचा त्याग केला ही गोष्ट संघाच्या या अपहरणकृत्याला अडसर ठरणारी गोष्ट होती.  म्हणुन त्यानी , आंबेडकरांनी हिंदु धर्माचा त्याग केला पण मुस्लिम , ख्रिश्चन या धर्माचा स्वीकार केला नाही. त्यांनी बौध्द धर्माचा म्हणजेच हिंदु धर्माच्याच एका उपपंथाचा स्वीकार केला अशी मांडणी केली. यातुन आंबेडकरांचे हिंदुप्रेम दाखविण्यावरच संघाचा भर दिसुन येतो.म्हणजे बौद्ध धर्म हा वेगळा धर्म नाही तर , हिंदु धर्मातच सुधारणा घडवुन आणण्यासाठी निर्माण झालेला तो एक पंथ आहे .अशी संघाने निर्माण केलेली धारणा.
पुढे जावुन अस्पृश्यता निवारण आणि जातीप्रथेबद्दल बोलत असताना, आंबेडकरांना जातीनिर्मुलन अपेक्षित होते , किंबहुना आयुष्यभर त्यानी त्याचाच ध्यास घेतला आणि समरसता मंचाच्या माध्यमातुन संघही तेच काम करतोय, हिंदु धर्मातील जातीप्रथा नष्ट होवुन अवघा हिंदु तेवढा एकत्र यावा अशीच संघाची भुमिका आहे. हे मांडण्याचा प्रयत्न संघाने सुरू केला. पण जातीनिर्मुलना बद्दल बोलत असताना बाबासाहेबानी त्यांच्या Anahilation of Caste या पुस्तकात ' जाती तोडताना आपणांस प्रथम जातीला धर्माने दिलेला पावित्र्यतेचा दर्जा काढुन घ्यावा लागेल' असे प्रतिपादन केले . सोबतच त्यांनी  जातीनिर्मुलनासाठी आंतरजातीय विवाहाचा कार्यक्रमही सांगितला .पण  याविषयी संघ काहीच सांगत नाही .याठिकाणी आंबेडकराना जातीनिर्मुलन आवश्यकत वाटत होते पण ते हिंदु एकतेसाठी नाही. हे लक्षात घ्यायला हवे. याची मीमांसा संघ नेमक्या उलट अर्थानी करतो. त्यानंतर हिंदुत्व आणि आंबेडकरांच्या विचारातील साधर्म्य शोधत असताना त्याना भारतीय मुस्लिमांच्या संदर्भातील आंबेडकरांचे तत्कालिन विचार म्हणजे जणु कर्णाची कवचकुंडलेच वाटतात. कितीही पलटवार होवु द्या आतला माणुस सुरक्षित. यात संघपरिवार बाबासाहेबांच्या  ' Pakistan or the  partition of India' या पुस्तकातील अवतरणे द्यायला चुकत नाही. ज्याअर्थी आंबेडकरांनी भारतीय मुस्लिम समाजा बद्दल प्रतिकुल विश्लेषण केले.त्यामध्ये हिंदु आणि मुस्लिम एकत्र राहु शकत नाहीत. त्यांच्या भवितव्यता वेगळ्या आहेत. किंवा मुस्लिम हे मागासलेले, धर्मांध आहेत. अशी त्यानी केलेली टिपणी . या सर्वामागे आंबेडकरांची भुमिका , " ही सर्व कटकट मिटवा व एकदाचा काय तो निकाल लागु द्या" या पठडीतली होती. ही बाब पळशीकर प्रस्तुत पुस्तकात अधोरेखीत करतात. मात्र याचा आधार घेत आंबेडकरांचे मुस्लीमविषयक मते व संघाचे विचार यात कमालीचा सारखेपणा आहे.असे चित्र उभे केले जाते . यातील तथ्य हा अभ्यासाचा विषय आहे. फाळणीच्या वेळेस पाकिस्तान एकदाचे मुस्लिम लीगच्या लोकांना देवुन टाकावे. या आंबेडकरांच्या भुमिकेमागे दोन तत्वे आहेत. एक देशाची सुरक्षितता व दुसरे स्वयंनिर्णयाचे तत्व. तुम्हांला जर भारतीय मुस्लिमांबद्दल निर्णय घ्यायचा असेल तर त्यानाच तो निर्णय घेवु दिला जावा. व त्यांची इच्छा जर स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती असेल तर ती  व्हावी.असा आंबेडकरांच्या विवेचनामागचा हेतु होता. संघपरिवार याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करतो. बाबासाहेब या प्रश्नावर पाकिस्तान देवुन टाकावे हा एकमेव पर्याय सांगत नव्हते. तर 1940 साली त्यानी
' Pakistan or the  partition of India' लिहिल्यानंतर सन 1945 त्यानी ' Communal Deadlock: the way to solve it.' हा निबंध लिहिला. यामध्ये आंबेडकरांनी अल्पसंख्याकाना पुरेसे आधिकार कसे देता येतील ? याची भारताच्या संदर्भात चर्चा केली आहे. त्याचबरोबर जागतिक संदर्भात  ते ऑफ्रिका, कँनडा इ. देशाचा संदर्भ देवुन अल्पसंख्यांक हे बहुसंख्यांकाबरोबर एकत्र नांदु शकतात. असे प्रतिपादन आंबेडकरांनी केले. एकुणच होता होईतो विभाजन टाळावे असाच बाबासाहेबांचा हेतु होता. हे संघपरिवार कधीच पुढे आणत नाही. बाबासाहेबांना भारताचे जे सांस्कृतिक वैविध्य होते के सुद्धा जपायचे होते. आणि समग्र भारतीय सांस्कृतिकतेचा विचार करता मुस्लिमांची जी संस्कृती आहे ती त्यांच्या अस्तित्वासह  वगळता येत नाही.हे सुज्ञास सांगणे न लगे. पळसीकर बाबासाहेबांच्या विचाराची चिकित्सा धर्मपरिवर्तन व फाळणीच्या संदर्भातच करून थांबत नाहीत  तर 
बाबासाहेबांच्या हिंदु विषयीच्या मताचाही दाखला देतात. यात पळशीकर हे नमुद करतात की, " हिंदुस्थान  हिंदुचा , ही घोषणा केवळ उद्घटपणाची नाही तर टोकाच्या मुर्खपणाची (  Arrant Nonsense) आहे.असा आंबेडकरांचा अभिप्राय आहे. हिंदुराज हा  देशाला असणारा सर्वात  मोठा धोका आहे .असेही ते सांगतात. चिकित्सा , डॉ . आंबेडकरांच्या हिंदुकरणाची या पुस्तकात पळशीकर अतिशय अभ्यासपुर्ण पद्धतीने अगदी तपशीलवार असे दाखले देत , आंबेडकरांची हिंदुविषयक तत्कालिन मते , काळाप्रमाणे बदलत गेलेली मते व आंबेडकरांनी केलेले धर्मांतर याचा आढावा घेतात. आंबेडकरांच्या हिंदुविषयक धारणांचा व काही ठिकाणी उल्लेखित मुस्लिम विषयक प्रतिकुल मतांचा विपर्यास संघपरिवाराने कसा केला ? हे ही दाखवुन देतात. यामध्ये पळशीकर आंबेडकरी चळवळीला दोष द्यायला चुकत नाहीत. मलाही  वाटतं ते योग्यच करतात  आंबेडकरवादी व परिवर्तनवादी चळवळीच्या नाकर्तेपणामुळेच संघपरिवाराला  आंबेडकरांचे हिंदुविचार संघसमावेशक असल्याचे दाखविण्याची हिंमत झाली.वैचारिक  पटलावर आंबेडकरांच्या विचारांच भगवीकरण होणं ही दलित, बहुजन परिवर्तनवादी चळवळींच्या आक्रमकतेची धार कमी करून परिवर्तनाच्या रथाला खीळ घालणारी बाब आहे. यातुन संघपरिवाराला प्रतिकांच्या राजकारणातुन यश मिळेल असं नाही तर आंबेडकरांच्या हिंदुविषयक मताचा विपर्यास झाल्याने आंबेडकरांच्या वैचारिक गाभ्यालाच धक्का पोचेल. हे थांबवायच असेल तर आपण वेळीच सावध झालं पाहिजे. संघपरिवाराकडुन सातत्याने होत असणारा कट्टर हिंदुत्वाचा जागर बघत मुळ गिळुन शांतपणे आपल्या घरात बसलेल्या पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्याच्या डोळ्यात अंजन घालणारं प्रभावी पुस्तक प्रत्येकांनी जरूर वाचावे.त्याचबरोबर आज आंबेडकर जयंतीच्या औचित्याने आंबेडकरी  चळवळी समोरील नव्या आव्हांनाना समजावुन घेवुन त्याची सखोल चिकित्सा व विश्लेषण करत मार्गक्रमण केले पाहिजे. तरच आपण खर्या अर्थाने बाबासाहेबांना अपेक्षित देश घडवु शकु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा ! जय भीम 
     विक्रांत शंके संपर्क :9890766640
shankevikrant7@gmail.com
( लेखक महाराष्ट्र जीवन लाईव्ह समुहात वृत्तनिवेदक पदावर कार्यरत आहेत .) 


          संदर्भ


(1) चिकित्सा : डाँ. आंबेडकराच्या  हिंदुकरणाची - सुहास पळशीकर
हरिती पब्लिकेशन पुणे,
मुल्य -50 र


(2) The Annihilation of cast -  Dr B R Ambedkar writing and speeches - Volum no - 1


(3 ) PAKISTAN OR THE PARTITION OF INDIA